देशात 'अच्छे दिन' येणार.....



देशात 'अच्छे दिन' येणार, असा विश्वास जनतेला देऊन पंतप्रधानपदी विराजमान होण्यास सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या आदल्याच दिवशी भारताला एक चांगली बातमी मिळाली आहे. पाकिस्ताननं आज भारताच्या १५१ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे. भारत-पाक मैत्रीच्या नव्या अध्यायाचा हा शुभारंभ ठरावा, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी दिले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भाजपनं नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं होतं. ते स्वीकारून शरीफ उद्या मोदींच्या शपथविधीला हजर राहणार आहेत. त्यानंतर २७ मे रोजी द्विपक्षीय संबंधांबाबत भारत-पाकमध्ये चर्चाही होणार आहे. या सर्व घडामोडींचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. दोन्ही देशांना 'अमन की आशा' असल्याचे संकेत त्यातून मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर, पाकिस्ताननं १५१ भारतीय कैद्यांची सुटका करण्याची घोषणा काल केल्यानं सगळ्यांनाच सुखद धक्का बसला होता. त्यानंतर आज कराची तुरुंगातील ५९ कैद्यांना पाकनं मुक्त केलं. थोड्याच वेळात हैदराबाद तुरुंगातून ९१ कैदी सोडण्यात आले. या कैद्यापैकी १५० जण मच्छिमार आहेत. हे सर्वजण लाहोरकडे निघाले असून वाघा सीमेकडून सोमवारी भारतात प्रवेश करणार आहेत. म्हणजेच, मोदींच्या शपथविधीआधी हे भारतीय नागरिक स्वगृही परतलेले असतील. स्वाभाविकच, त्यांच्या कुटुंबीयांसाठी उद्यापासून 'अच्छे दिन' सुरू होणार आहेत. पाककडून पुढेही असंच सहकार्य मिळत राहावं, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केलेय.

श्रीलंकेचीही खुशखबर

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला येण्याआधी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनीही भारतीयांना खुशखबर दिली आहे. तेही श्रीलंकेतील सर्व भारतीय कैद्यांची सुटका करणार आहेत. सद्भावना म्हणून आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....